मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत.
महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे.
शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईचा महापौर आपल्याच पक्षाचा असेल, असा दावा करण्यात येतोय. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेनं उचललेलं पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय.
गट स्थापन केल्याने काय होईल?
महापौर निवडीवेळी दगाफटका टाळणे हे गट स्थापन करण्याचं मुख्य उद्दीष्ट असतं. शिवसेनेने जो गट स्थापन केला, त्याचा उद्देश तोच आहे. या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांसमोर करावी लागते. या गटाचा व्हिप त्या गटाला लागू असतो. शिवसेनेने स्वत:चे ८४ आणि अपक्ष ४ असे ८८ जण एका गटाचे आहोत, असं या गटाद्वारे आयुक्तांना सांगितलं.
त्यामुळे प्रत्यक्ष महापौर निवडीवेळी दगाफटका झाला तर संबंधित नगरसेवकाचं निलंबन होऊ शकतं.
त्यामुळे महापौर निवडीच्या दृष्टीने शिवसेनेने सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत
राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये कोंडी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने ते दिल्लीत असतील. मात्र याठिकाणी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची ते भेट घेणार असल्याचं समजतंय.
भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जातेय.